कुवैत महाराष्ट्र मंडळात ‘मैतर’
१६ मे चा कार्यक्रम होणार होणार…आणि इथल्या अमीर च्या १४ मे ला झालेल्या निधनाने सर्वत्र ३ दिवसांचा दुखवटा जाहीर झाला. आता कसं होणार.. कार्यक्रम होतो की नाही..पण मंडळाच्या कार्यकारी सदस्यांनी अथक प्रयत्न करून ह्या कार्यक्रमांत थोडा बदल करून शनिवार १७ मे ला दुपारी १२ वाजता ठरवला. कार्यकारी मंडळाबरोबरच भारतीय दूतावासाचे श्री भाटिया ह्यांचा मोलाचा सहभाग हा कार्यक्रम सफल करण्यात होता. ह्या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद व्यक्त करायलाच हवेत.
‘मैतर’ कार्यक्रमांत आपापल्या क्षेत्रातले सगळे हीरे च आहेत. सुबोध भावे, शौनक अभिषेकी, शर्वरी जमेनिस, डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि बेला शेंडे. ह्या सगळ्या नांवातच आहे सगळं की वेगळ्याने त्यांच्या कलेची ओळख करून द्यायचीच गरज नाही. ह्या दिग्गजांची आपापली व्यस्तता आहे, त्यांनी सगळ्यांनीच एकाच वेळी तेव्हढा वेळ काढून बरोबर येणे आणि कार्यक्रम करणे हेच कौतुकास्पद आहे.
कार्यक्रम थोडा उशीरा सुरू झाला खरा पण इतक्या छान कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतांना हा असा उशीर कोणाला जाणवलाच नसेल. .. सुबोध भावे ह्यांनी सगळ्या मैतर सदस्यांची ओळख करून दिली व कार्यक्रमाला सुरूवात झाली. ह्या सगळ्या मैतरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. काही अपरिहार्य कारणांमुळे भारतीय दूतावासाचे श्री भाटिया हे कार्यक्रम सुरू झाल्यावर पोहोचले त्यामुळे मधे ५ मिनिट कार्यक्रम थांबवून श्री भाटिया ह्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे खूप आभार मानण्यात आलेत.
शौनक अभिषेकींच्या आवाजाची तर जादूच आणि बेला शेंडे चा मोहक अप्रतिम सुंदर आवाज… ह्या दोघांची सुरेल गाणी, सलील कुलकर्णी संदीप खरे.. आयुष्यावर बोलू काही ची जोडी..संदीप खरे चे कविता वाचन, शर्वरी चे नृत्य..तिच्या भराभर अति वेगाने त्या गिरक्या..थिरकणारी तिची पावले आणि सुबोध भावेचा किती सहज अभिनय..बिना ग्लिसरीन चे अभिनयात डोळ्यात पाणी येऊ शकते हे आम्ही सगळेच प्रत्यक्ष बघत होतो..सगळेच शहारले असणार… नजर खिळवून ठेवली होती सगळ्यांनीच..किती वाखाणावे तेव्हढे कमीच. सगळे एका जागी स्तब्ध बसलेले…कधी हे संपायलाच नकोय….मधे मधे होणारे विनोदी भाष्य…मस्करी आम्हा सगळ्यांना हसवत होतेच.
मध्यांतरात गरम समोसे…थंड ताक… हवा असेल तर गरम चहा कॉफी…..सगळ्यांनी आस्वाद घेतला व कार्यक्रमाचा दूसरा भाग सुरू झाला. ह्या भागात तर अनपेक्षित असंच बघायला मिळालं. खूपच कौतुकास्पद.. सगळ्याच कलाकारांनी आपापल्या क्षेत्राच्या विपरीत सादरीकरण केलं. संदीप खरे, सलील कुलकर्णी, बेला शेंडे आणि शौनक अभिषेकी ह्यांनी अभिनयाचे छोटे छोटे प्रवेश उत्तम केलेत.. बरोबरच सुबोध भावे आणि शर्वरी ने म्हंटलेलं द्वंद्व गीताने पण रंगत वाढवली. डॉ सलील कुलकर्णींच्या इंग्लिश गाण्याने सगळेच डोलायला लागले होते. मज्जा आली…..बघता बघता साडे तीन तास संपलेत पण….महाराष्ट्र मंडळ सातत्याने चांगले कार्यक्रम देतच आलेय पण ह्या मैतर कार्यक्रमासाठी तर वेगळ्याने धन्यवाद द्यायलाच हवेत महाराष्ट्र मंडळाला…
सगळेच कलाकार इथल्या आदरातिथ्याने भारावून गेलेत….कुवैत चा हा मराठी परिवार त्यांना आपलाच वाटला ह्यात सगळंच मिळालं नं आम्हा कुवैतकरांना…
- दीपिका जोशी ‘संध्या’