मैतर
जिवाचे
|
 |
प्रत्येकाच्या जीवनात 'मैत्री' या शब्दाला
महत्त्वाचं स्थान आहे आणि कलाक्षेत्रात वावरणारी मित्रमंडळी जेव्हा
एकत्र येतात, तेव्हा त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टींची निर्मिती
होते. पुण्याच्या प्रत्यय थिएटर्सचा 'मैतर' हा कार्यक्रम पाहताना हाच
अनुभव येतो. या कार्यक्रमाची संकल्पना सुबोध भावेची आहे. सुबोध भावे,
शर्वरी जमेनीस, संदीप खरे, सलील कुलकर्णी, बेला शेंडे आणि शौनक अभिषेकी
या पुण्यातल्या कलाकार मित्रांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम सादर केला
आहे. सगळेच टॅलेण्टेड! कोणाकडे संगीताची तर कोणाकडे काव्याची, कोणाकडे
नृत्याची तर कोणाकडे अभिनयाची कला असल्याने या सर्व कला एकत्रित
पाहण्याचा अनुभव 'मैतर' देतो.
या कार्यक्रमाचं
वैशिष्ट्य म्हणजे यात औपचारिकतेला वाव नाही. त्या खरोखरच गप्पा आहेत.
'मैतर'ची विभागणी चार भागांत करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यावर
कोणाचा ना कोणाचा प्रभाव असतो. त्यापैकी काही व्यक्तींना आपण प्रत्यक्ष
पाहिलेलं नसतं पण त्यांच्या कलाकृती (गाणं, काव्य वगैरे) ऐकलेल्या,
वाचलेल्या, पाहिलेल्या असतात. अशा प्रभावी व्यक्तींच्या कलाकृती ही सहा
कलाकार मंडळी आपल्यासमोर सादर करतात. बेला शेंडेच्या मनात माणिक वर्मा
आणि मालती पांडे या गायिकांबद्दल अपार आदर आहे.
दिग्गजांच्या कलाकृती 'मैतर'च्या पूर्वार्धात
सादर होतात. त्यात शर्वरी जमेनीसचं कथ्थक नृत्य, तिच्या गुरू रोहिणी
भाटे यांच्याविषयी तिने केलेलं भाष्य उत्कंठा वाढवणारं आहे. शौनक
अभिषेकीचा मिश्किलपणा 'मैतर' पाहिल्यावरच लक्षात येण्यासारखा आहे.
पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताने सलील कुलकर्णी प्रभावित आहे.
प्रत्यक्षात हृदयनाथांसमोर त्यांचंच गीत सादर करताना काय वाटलं, हा
किस्सा सलीलच्या तोंडून ऐकण्यासारखा आहे. पं. जीतेंद्र अभिषेकींच्या
संस्कारांनी शौनकला घडवल्याचं त्याची गीतं ऐकताना जाणवतं. संदीप खरे या
कवीचा आजचा चाहतावर्ग कसा आहे, हे त्याच्या कवितांना येणा-या तुफान
प्रतिसादावरून कळतं.
अमुक एक करता आलं असतं तर,
गीत, भूमिका इत्यादी किंवा नाटकात काम केलं असतं तर किंवा अमुक एका
सिनेमात नृत्य करता आलं असतं तर... आणि कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ही
सहा जण आपल्या ड्रीमरोल, ड्रीम प्रोजेक्टचा अनुभव घेता येतो. कानेटकर,
दळवी, तेंडुलकर यांच्या नाटकात जशी पल्लेदार वाक्यं, भाषेचं कोंदण आणि
दजेर्दार स्वगतं असतात, ती सध्याच्या नाटकात नसतात अशी खंत सुबोधने
'मैतर'च्या निमित्ताने व्यक्त केली. अशा दर्जेदार कलाकृती सध्या
निर्माण होत नाहीत आणि आम्हा कलाकारांची स्वप्नं अधुरी राहतात.
मुलाखतीत कलाकारांना अनेकदा विचारलं जातं, तुम्ही या क्षेत्रात आला
नसतात, तर काय केलं असतं? नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर 'मैतर'चा अखेरचा
टप्पा देतो आणि या सहा जणांचा परफॉर्मन्स असणारा गीत-अभिनयाविष्कार
कार्यक्रमाची सांगता करतो.
' मैतर'चा प्रत्येक
प्रयोग वेगळा असेल. प्रत्येक प्रयोगात नवीन गाणी, नवीन कविता, नवीन
नाट्यस्वागतं, नृत्य असतील. प्रयोगागणिक 'मैतर' मैत्रीचे बंध अधिक दृढ
करेल आणि या कलाकार मंडळींचं आयुष्य आपल्यासमोर उलगडत जाईल.
| |